... कधीतरी

Thursday, June 16, 2005

मी आणि माझे रूममेट्स

शिक्षणासाठी घराबाहेर पड्ल्यानंतर आपले मित्र हाच आपला मोठा आधार असतो. त्यातही अगदीच जवळचा मित्र म्हणजे आपला रूममेट. बाहेर लोकांसमोर तुमचे इम्प्रेशन काही असो. रूममेट ही एक अशी व्यक्ती असते जी तुम्हाला 'अंतर्बाह्य ओळखून' असते. अड्ल्या-नड्ल्या प्रसंगी रूममेटच उपयोगी पड्तो.

काही रूममेट खरोखरीच वर उल्लेखल्याप्रमाणे एकदम आयडीयल असतात. पण काही मात्र अगदी 'राशीला बसल्यासारखे' आपल्या आयुष्यात येतात. अशा वेळी दिवस मोजण्याखेरीज इलाज नसतो.

मला आतापर्यंत या दोन्ही प्रकारचे रूममेट लाभले आहेत. हॊस्टेलवर असताना असंख्य प्रकारच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पहायला मिळाल्या. रूममेटही त्यातलाच एक प्रकार. (माझे जे कोणी रूममेट हा ब्लॊग वाचत आहेत, ते पहिल्या प्रकारात येतात. त्यामुळे त्यानी निश्चिंत होऊन पुढ्ला भाग वाचावा)

शिक्षणानंतर आता नोकरीसाठी बाहेर पड्लो तरी रूममेट हा प्रकार बरोबर असतोच. इथे आल्यावर मला एकदम वेगवेगळ्या 'टाइपचे' रूममेट पाहायला मिळाले. मी जेंव्हा इथे आलो, तेंव्हा माझे तीन रूममेट होते - एक तामिळ, एक कन्नड आणि एक बिहारी. प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी, त्यामुळे जेवणात भाजी कुठली बनवायची इथपासून वादाला सुरुवात. बिहारी बंधुला 'आलू' म्हणजे जीव की प्राण, तर तामिळ मित्राला बटाट्याचा तीव्र तिटकारा. ते दोघेही कायम एकमेकांची कशी जिरवता येइल ते बघायचे. म्हणजे जेंव्हा तामिळ रूममेट भाजी आणायला जाई, तेंव्हा तो बटाटे अजिबात आणत नसे, तर जेव्हा बिहारीबाबू भाजी आणीत तेंव्हा बटाटेच बटाटे. नंतर त्यातला जो कन्नड रूममेट होता तो काही महिन्यांसाठी बाहेर गेला, त्याच्याऐवजी आला - एक तेलगु रूममेट ! त्यामुळे हाही काय 'प्रकार' असतो ते बघायला मिळाले. काही दिवसांनी तो कन्नड रूममेट परत आला, आणि आमच्या फ्लॆटवर - एक तामिळ, एक बिहारी, एक कन्नड, एक तेलगु आणि मी मराठी असे मिश्रण बनले. काही असो, पण प्रत्येकाच्या तर्हा बघून मजा यायची. (अर्थात मीही त्यातलाच एक होतो...)

वर्षभरानंतर मात्र एक एक जण सोडुन चालला, आणि समीकरण पुन्हा बदलले.

सद्ध्या स्थिती अशी आहे, की मी, तीन बिहारी रूममेट्सबरोबर राहतोय... इतकेच काय, तर आमची स्वयंपाकीण पण बिहारी ... (अर्थात मेजॊरिटीचा विजय होणार हे तर ओघानेच आले) त्यामुळे सद्ध्या आयुष्यात 'बटाटयाशिवाय' दुसरं काय नाय ... कधी तरी अगदीच बदल म्हणुन मग मी याआधी कधीच पाहिल्या नाहीत अशा काही पालेभाज्या आणल्या जातात, आणि मग त्यात बटाटा (तो तर हवाच !) आणि पनीर :( घालून त्याची भाजी केली जाते. काही दिवसांपुर्वी माझी हिंदी सुधारली अशा खुशीत जो मी होतो, तिला आता 'ललवा' श्टाइल आली आहे. फ्लॆट्वरच्या सार्वजनीक स्वच्छ्तेचे केंव्हाच तीन-तेरा वाजले आहेत... माझा एकट्या-दुकट्या बिहारी माणसाविषयी अजिबात राग नाही (पण तिघांविषयी मात्र आहे ;), सॊरी, चौघांविषयी...)

तेंव्हा लोकहो, आपला एक मित्र उत्तर प्रदेशातल्या एका गावात मोठ्या हालाखीत दिवस काढतो आहे हे विसरु नका. नाहीतर काही दिवसानी माझी एकंदरीत हिंदी आणि पनीर-बटाटे खाऊन सुट्लेले शरीर पाहुन, मी कुणी यादव किंवा पाण्डे आहे अशी समजुत करुन घेतली तर त्यात नवल नको !


 
counters